श्रीराम समर्थ

परमपूज्य श्री केशव विष्णु बेलसरे म्हणजेच “ती. बाबा बेलसरे” हे, श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे, अलिकडच्या काळातील थोर शिष्य होऊन गेले.

अत्यंत सोपे वाटणारे परंतु सामान्य बुद्धीला आकलन न होणारे असे श्रीमहाराजांचे तत्वज्ञान ती. बाबांनी सर्वसामांन्यांपर्यंत आपल्या कार्यातून पोहोचवले. त्यांची नामसाधना, गुरुआज्ञापालन आणि पारमार्थिक प्राप्ती या सर्व साधकांसाठी आदर्श आहेत. त्यांचा जीवनप्रवास त्यांच्या कार्याइतकाच अलौकिक आहे !

प्रा. के. वि. बेलसरे यांचे रचित:

जयाचा जनी जन्म नामार्थ झाला।

जयाने सदा वास नामात केला।।

जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ति।

नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति।।

“ अथ समर्पणम्। “

दीनदासं दयासिन्धुं नित्यशुद्धं निरंजनम्।

समर्थं स्वस्वरुपं च रामदास्येन शोभितम् ।।१।।

पूर्णानन्दं प्रभुं शान्तं सर्वज्ञं मधुभाषिणम् ।

जपन्तमजपारामं तुर्यातीतं विलक्षणम् ।।२।।

त्यागमूर्तिं स्वयंज्योतिं निरीहं ब्रह्मवित्तमम् ।

सद्गुरुं ब्रह्मचैतन्यं बालकः प्रणतोऽस्म्यहम् ।।३।।

समर्पयामि वाक्पुष्पं ग्रन्थस्य चरणेषु च ।

अनेन प्रीयतां नित्यं गुरुदेवो महामनाः ।।४।।

भगवान् गुरुदेव !

आपल्या चरण-कमलीं आमचे शतशः प्रणाम असोत. आम्हां संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठीं अहोरात्र झटणें हेंच आपलें जीवनचरित्र होय. आम्ही आपलें खरे मानसपुत्र आहोंत. आपण भगवंताचें नामधन आमच्यासाठीं ठेवलें आहे. त्या नामामध्यें आम्हाला गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचें मन नामांत रंगून जावें हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे.

" हाचि निरोप गुरूंचा "

।। श्रीराम समर्थ ।।

नाम सदा बोलावें, गावें भावें, जनांसि सांगावें ।

हाचि निरोप गुरूंचा, नामापरतें न सत्य मानावें ।।१।।

नामांत रंगुनीया व्यवहारीं सर्व भोग सेवावे।

हाचि निरोप गुरूंचा, भोगासंगें कुठें न गुंतावें ।।२।।

आनंदात असावें, आळस भय द्वेष दूर त्यागावे ।

हाचि निरोप गुरूंचा, अनुसंधाना कधीं न चुकवावें ।।३।।

गोड सदा बोलावें, नम्रपणें सर्वलोकप्रिय व्हावें ।

हाचि निरोप गुरूंचा, भक्तीनें रघुपतीस आळवावें ।।४।।

स्वान्तर शुद्ध असावें, कपटाचरणा स्वयें न वश व्हावें ।

हाचि निरोप गुरूंचा, मन कोणाचें कधीं न दुखवावें ।।५।।

माझा राम सखा, मी रामाचा दास, नित्य बोलावें ।

हाचि निरोप गुरूंचा, रामापाशीं अनन्य वागावें ।।६।।

यत्न कसून करिन मी, यश दे, रामा, न दे, तुझी सत्ता ।

हाचि निरोप गुरूंचा, मानावा राम सर्वदा कर्ता ।। ७ ।।

आचारसंयमाने युक्त असा नीतिधर्म पाळावा ।

हाचि निरोप गुरूंचा, खेळाऐसा प्रपंच मानावा ।। ८।।

दाता राम सुखाचा, संसारा मान तूं प्रभूसेवा ।

हाचि निरोप गुरूंचा, संतोषा सर्वदा मनीं ठेवा ।। ९ ।।

स्वार्थ खरा साधा रे, नित्य तुम्ही नामगायनीं जागा ।

हाचि निरोप गुरूंचा, मीपण जाळोनिया जगीं वागा ।। १० ।।

अभिमान शत्रु मोठा, सर्वांना जाचतो सुखाशेनें ।

हाचि निरोप गुरूंचा, मारावा तो समूळ नामानें ।। ११।।

राज्याधिकार येवो, किंवा जावो समस्त धन मान ।

हाचि निरोप गुरूंचा, भंगावे ना कदा समाधान ।। १२ ।।

प्रेमांत राम रमतो, प्रेमाला मोल ना जगामाजीं ।

हाचि निरोप गुरूंचा, गुरुरायाला तहान प्रेमाची ।। १३ ।।

बातम्या आणि अद्यतने

प्रा.के.वि.बेलसरे यांचे ‘उपनिषदांचा अभ्यास’  हे पुस्तक पुनर्मुद्रित झाले आहे. (किंमत- रु.५५०)

‘श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय’ हे पुस्तक उपलब्ध झाले आहे. (किंमत – रु. ५००)

खालील पुस्तके लौकरच पुनर्मुद्रित होऊन उपलब्ध होतील. 

१. बृहदारण्यक उपनिषद् (ब्रह्मविद्याविषयक तीन संवाद​)

२. श्रीचैतन्यगीता

प्रा.के.वि.बेलसरे यांची पुस्तके, श्रीगोंदवले संस्थान, वितरक श्री. सारंग नेर्लेकर व त्यांच्या मालाड येथील निवासस्थानी उपलब्ध आहेत. वाचक, आपल्या शंका व अडचणींसाठी या वेबसाईटवर दिलेल्या  ई-मेल वर संपर्क करू शकतात.

वितरक – सारंग नेर्लेकर ग्रंथ वितरक

मोबाईल – ९५४५७७७७४४ / ०२० २४४५७२८८

ई-मेल – granthvitarak@gmail.com